नाकाबंदीचा जबरदस्त धाक बारामती पोलीसांनी पकडला ४७० किलो गांजा
बारामती/संपादक-(विकी आगम)
दि. 28 फेब्रुवारी 2026 – अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेतलेल्या पोलिसांनी बारामती विभागात मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल ४७० किलो गांजा जप्त केला आहे. सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये किंमतीचा हा साठा पोलिसांच्या कडक नाकाबंदीच्या धाकामुळे तस्करांनी शेतात टाकून पळ काढल्याने उघडकीस आला.होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विशेष नाकाबंदी, रात्रगस्त आणि वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती.पोलिसांचा वाढता दबाव आणि सर्व प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे घाबरलेल्या तस्करांनी मौजे जळोची, पिंपळी रोड परिसरातील मोकळ्या शेतजमिनीत गांजाने भरलेले दोन मोठे ड्रम टाकून फरार झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मोठा साठा जप्त केला.प्राथमिक तपासातून असे स्पष्ट झाले आहे की, होळीच्या निमित्ताने बारामती व आसपासच्या परिसरात विक्रीसाठी हा साठा आणण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या कडक आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे तस्करांचा मोठा डाव पूर्णपणे हाणून पाडण्यात आला.दरम्यान, सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.प्रभारी पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी व त्यांच्या पथकाने अत्यंत दक्षता आणि समन्वय राखत ही कारवाई यशस्वी केली. या धडाकेबाज कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा आळा बसणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, बारामतीत कायद्याचा धाक कायम आहे.नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

