मौलाना अब्दूल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर;भाजप युवा मोर्चाचा पोलीस प्रशासनाला ईशारा..
बारामती/संपादक-(विकी आगम)
बारामतीतील बहुचर्चित मौलाना अब्दुल हलीम शेख प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर अद्याप अटकेची कारवाई झालेली नसल्याने तपासाच्या गतीवर आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणात आरोपी अनेक मोबाईल फोन वापरत असल्याचा, तसेच काही मोबाईलचे लोकेशन पश्चिम बंगाल आणि कश्मीरपर्यंत आढळल्याचा खळबळजनक दावा भाजप युवा मोर्चाचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी केला आहे. वैभव सोलनकर यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून फिर्यादींवर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात मौलाना अब्दुल हलीम शेख, त्यांची पत्नी आणि अन्य साथीदारांविरोधात आर्थिक फसवणूक, मानसिक छळ आणि विनयभंगासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन कालावधी उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
“१० ते १५ मोबाईल असतानाही तपास कुठे?”
पत्रकार परिषदेत वैभव सोलनकर यांनी थेट सवाल उपस्थित केला.
“आरोपी आरिफ मुजावर याच्याकडे १० ते १५ मोबाईल फोन असल्याची माहिती असूनही हे मोबाईल ताब्यात घेऊन तपास का केला जात नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच आरोपी उजळ माथ्याने फिरत असून फिर्यादींवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
२५ जूनला बारामतीत आंदोलनाचा इशारा
या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आता रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
येत्या २५ जून रोजी बारामती शहर पोलीस ठाण्यासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैभव सोलनकर यांनी दिला आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांवर पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पुढील काळात पोलीस तपास आणि कारवाईकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




