साहित्य निर्मिती शाश्वत आणि चिरंतन ठेवणे महत्त्वाचे : प्राचार्य गोसावी
बारामती येथील रागिनी फाउंडेशन आणि पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ती’च्या कविता या विषयावर आधारित कवी संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात कविता या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.परिसंवादात कवितेची निर्मिती, कविता हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम, तसेच साहित्य निर्मिती शाश्वत व चिरंतन ठेवण्याचे महत्त्व या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.या वेळी प्राचार्य सिताराम गोसावी (माजी प्राचार्य, रयत शिक्षण संस्था), प्रा. डॉ. सीमा नाईक-गोसावी (मराठी विभाग प्रमुख व कला शाखा अधिष्ठाता, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती), वनकवी लक्ष्मण शिंदे (वन अधिकारी, पुणे) आणि रागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी आपले विचार मांडले.यावेळी बोलताना प्राचार्य गोसावी म्हणाले की, “साहित्य निर्मिती चिरंतन आणि शाश्वत ठेवण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिकांचे चरित्र व त्यांच्या साहित्याचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे.”‘ती’च्या कविता या विषयावर विविध कवींनी आपल्या रचना सादर केल्या. या माध्यमातून स्त्री जन्माचा महिमा आणि स्त्रीच्या जीवनात घडणाऱ्या बदलांवर प्रकाश टाकण्यात आला.या संमेलनासाठी विविध ठिकाणांहून कवी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंचक्रोशी प्रकाशनचे प्रमुख बाळासो करचे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास रागिनी फाउंडेशनचे सदस्य प्रकाश आबा शिंदे, शुभांगी चौधर, ज्योती बोधे, सुजाता लोंढे आणि पूजा उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री अलका रसाळ यांनी केले. शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभागी कवींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




