वादळी पावसानंतर पोलिसांची धाव; रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा
बारामती/संपादक-(विकी आगम) बारामती शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे व फांद्या रस्त्यावर कोसळल्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांची गैरसोय झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीत बारामती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तत्परता दाखवत रस्त्यावर उतरून मदतकार्य हाती घेतले. पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार माया निगडे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे, दत्तात्रय भोसले आणि पांडुरंग सापते यांनी पावसाची तमा न बाळगता रस्त्यावर पडलेली झाडे व फांद्या हटविण्याचे काम केले. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून वाहने आणि नागरिकांना मार्ग उपलब्ध करून दिला.
वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीत पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा नागरिकांसाठी दिलासादायक ठरली. रस्ते बंद होण्याची शक्यता असताना पोलिसांनी त्वरित उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या अडचणींपासून दिलासा मिळाला. संकटकाळात केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचेच नव्हे, तर नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे कर्तव्यही पोलिसांनी पार पाडले. बारामती वाहतूक शाखेच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून, पावसातही सेवाभाव जपत काम करणाऱ्या या पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )

