अजित दादांच्या निधनामुळे बारामतीत शिवजयंती पालखी सोहळा साध्या पद्धतीने

बारामती/संपादक-(विकी आगम)
छत्रपती जन्मोत्सव समितीच्या वतीने बारामती शहरात तिथीनुसार साजरी केली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती यंदा साध्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. दादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पालखी सोहळा अत्यंत साधेपणात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्रेरणामंत्राने पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आणि पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.
या पालखी सोहळ्यात वारकरी भजनी मंडळ तसेच पारंपरिक वेशातील मावळ्यांचे रणमर्द शिलेदार आणि स्वराज्यकालीन गुप्तहेरांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या युवकांनी सोहळ्याला ऐतिहासिक आणि पारंपरिक रंग चढवला. वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.प्रदक्षिणेचा समारोप तिरंगा सर्कल येथे करण्यात आला. येथे दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.यावेळी बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेठ सातव व माननीय पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी साहेब, व बारामती नगर परिषदेचे इतर नगरसेवक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच छत्रपती जन्मोत्सव समितीचे सदस्य रोहन ढवाण, सागर जाधव, संदीप जाधव, चारूदत्त काळे, मयुर अष्टेकर, मयुर भापकर, कुणाल भोईटे यांनी या सोहळ्याच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.यंदाची शिवजयंती दादांच्या स्मृतीत अत्यंत साध्या पण भावनिक वातावरणात साजरी करण्यात आली.

मुख्य संपादक -सूरज(विकी)आगम
उपसंपादक-( विवेक साळुंके )




